लोकसभेपेक्षा विधानसभा निवडणुकीचा प्रचार जरा जास्तच
करण्यात आला आहे. डिजिटल जाहिरातींनी तर मोबाईलवर धुमाकुळ घातला. एकेका उमेदवाराचे
अनेकदा फोन आल्याने मतदार ते फोन उचलून वैतागले आहेत.
महाराष्ट्र विधानसभा
निवडणूक प्रचाराची आज सांगता झाली. दोन्ही बाजूच्या आघाडी आणि युती यांच्यातील
प्रमुख सहा पक्ष तसेच इतर छोटे-मोठे पक्ष, तिसरी आघाडी, अपक्ष उमेदवार यांनी जोरदार
प्रचार केला. राज्यातील उमेदवार, नेते
यांच्या सभा, आरोप-प्रत्यारोप याबाबतच्या सर्व भाषणं ही
प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे मतदारांनी पाहिली आणि ऐकली आहेत. महाराष्ट्रातील
प्रमुख दोन पक्ष शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस फुटल्यानंतरची ही पहिली
विधानसभा निवडणूक आहे. मराठा आरक्षण, मराठा विरुद्ध ओबीसी असं झालेलं जातींमधील
ध्रुवीकरण, लाडकी बहिण सारखी योजना, आणि शेतीचे प्रश्न या भोवती ही निवडणूक फिरत
आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.
दिवाळीनंतर खरी
महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात झाली होती. यंदा घरोघरी
प्रचार करण्यापेक्षा डिजिटलीच जास्त प्रचार केला गेला. फारतर दोन-तीन उमेदवारांचे
कार्यकर्ते घरा घरात प्रचाराला गेले असतील. परंतू,
उमेदवारांच्या रेकॉर्डेड कॉलनी मतदारांना एवढे भंडावून सोडलेले.
यावेळच्या विधानसभा निवडणुकीतील राजकीय पक्षांच्या जाहिराती कमालीच्या आक्रमक
आहेत. महाविकास आघाडीने थेट निशाणा साधलाय तर महायुतीने पुन्हा एकदा हिंदू कार्ड
वापरून राजकीय ध्रुवीकरणाचा जुना पत्ता टाकला आहे. मतदार आता कशाला प्राधान्य
देणार हे २० तारखेला निश्चित होईल. मात्र एक प्रश्न पुन्हा पुन पडतोय, आपली लोकशाही प्रगल्भ होतेय की, आपण पुन्हा मागेच
निघालोय. आज सायंकाळी ६ वाजल्यापासून प्रचाराच्या तोफा थंडावल्या असून आता रात्र
वैऱ्याची आहे असे म्हणत आता चुकीच्या गोष्टी, गैरप्रकाराला
आळा घालण्यासाठी पाळत ठेवली जाणार आहे. थोडक्यात कंदील प्रचार सुरु होणार.
लोकसभेपेक्षा विधानसभा
निवडणुकीचा प्रचार जरा जास्तच हायटेक करण्यात आला आहे. डिजिटल जाहिरातींनी तर
मोबाईलवर धुमाकुळ घातला. एकेका उमेदवाराचे अनेकदा फोन आल्याने मतदार ते फोन उचलून
वैतागले. अनेकदा तुम्ही काही वर्षांपूर्वी वेगळ्या मतदारसंघात खरेदी केली किंवा तिथे
राहत असाल तर त्या मतदारसंघातल्या उमेदवारांचेही फोन आलेले आहेत.
विधानसभा निवडणुकीच्या
प्रचाराचा आज शेवटचा दिवस असून सर्व नेत्यांनी आपापल्या मतदारसंघात सांगता सभांचं
आयोजन केलं आहे. सर्वच पक्षांनी या निवडणुकीत जोरदार कंबर कसलेली दिसत आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष व ज्येष्ठ नेते शरद
पवार यांनी त्यांच्या पक्षाचे बारामतीचे उमेदवार युगेंद्र पवार यांच्यासाठी
बारामतीत सभेचं आयोजन केलं होतं. या सभेत त्यांनी शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा
प्रश्न मांडला. तसंच लाडकी बहीण योजनेवरुनही सरकारवर टीका केली. शेतकऱ्यांच्या
डोक्यावरचं कर्ज फेडणं या सरकारला जमलेलं नाही. शेतमालाला किंमत द्यायची नाही, निर्यातबंदी लादायची हे या सरकारचं धोरण
आहे असं शरद पवार यांनी म्हटलं आहे. दुसरीकडे भाजपचे नेते आणि उपमुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस यांनी पावसात भिजून निवडणूक जिंकता येत नाही असा टोला लगावला.
दुसरीकडे गद्दार विरुद्ध खुद्दार असा प्रचार दोन्ही शिवसेनेत रंगलेला पाहायला
मिळाला. कॉग्रेसने संविधान बचावचा नारा दिला.
या निवडणुकीत कोणता फॅक्टर
चालणार?
अवघ्या काही
महिन्यांपूर्वी जून मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला मिळालेल्या यशानंतर
विधानसभेतही याच विजयाची पुनरावृत्ती होऊ शकते असा विश्वास अनेक राजकीय
निरीक्षकांनी लोकसभेनंतर व्यक्त केला होता. मात्र मुख्यमंत्री एकनाथ
शिंदेंच्या नेतृत्वातील महायुती सरकारने राज्यभर विविध योजना आणि महामंडळं लागू
करून निवडणुकीत परतण्याचा प्रयत्न केला आहे.
२०१४ नंतर महाराष्ट्रात
भाजप हा एक मोठा पक्ष म्हणून उदयाला आला. त्यामुळे या निवडणुकीत भारतीय जनता पक्ष
हा वर्चस्वशाली पक्ष म्हणून उदयाला येण्याचा प्रयत्न करेल. यात दुसरी शक्यता अशी
आहे की, सध्या ज्या पद्धतीने युती आणि आघाडीचं
राजकारण आहे, त्याच पद्धतीने हे राजकारण पुढची पाच ते दहा
वर्षं चालू शकतं. तिसरा फॅक्टर हा आहे की सध्या राज्यात अनेक छोटे पक्ष उदयास आले
आहेत, त्यामुळे निकालानंतर एक मोठा पक्ष आणि असे छोटे पक्ष
एकत्र येऊन एक नवीन समीकरण तयार होऊ शकतं.
निवडणुकीत शेतीचे प्रश्न खूप महत्वाचे ठरतील. सोयाबीन, ऊस, कापूस आणि कांद्याचे प्रश्न महत्त्वाचे ठरू शकतील. ही पिकं घेणाऱ्या शेतकऱ्यांचा अडचणी या निवडणुकीच्या निकालावर परिणाम करू शकतात. सध्या लोकांचं आयुष्य सुखी नाही हा जो मुद्दा आहे, तो कुठेतरी लोकांच्या मनात राहणार आहे. कोणताच राजकीय पक्ष आपल्याला हे देत नाही हे जरी खरं असलं. तरी त्याची झळ नेहमी जास्त करून राज्यकर्त्यांना बसते.
राज्यभर मराठा विरुद्ध ओबीसी वाद
मनोज जरांगे पाटील आणि
लक्ष्मण हाके यांच्या मराठा आंदोलनामुळे राज्यभर जो मराठा विरुद्ध ओबीसी वाद पेटला
आहे त्याचा सुद्धा परिणाम होऊ शकतो. महाराष्ट्राच्या
निवडणुकीत जात हा घटक सर्वात जास्त परिणाम करणार आहे. महाराष्ट्रात जातीवादाचं रूप
नाही परंतु जात ही आरक्षणाच्या आणि प्रदेशाच्या अंगाने खूप महत्त्वाची झालेली आहे.
म्हणजे तुम्ही मराठवाड्याचा विचार केला तर तिथे जरांगे पाटील यांचं आरक्षणासाठीचं
आंदोलन, त्याच्याविरोधात ओबीसींचा आंदोलन. या
रूपामध्ये जातींची गणितं जुळवणं हे राजकीय पक्षांचं पहिलं ध्येय असल्याचं दिसतं.
लोकसभेतील दारूण पराभवानंतर भाजपप्रणीत महायुती कमबॅक करेल का?
लोकसभेच्या निवडणुकीनंतर महाविकास आघाडी प्रचंड पुढे होती. पण सध्या दोन्ही बाजू समसमान दिसत आहेत. गेल्या दोन महिन्यामध्ये वेगवेगळ्या घोषणा करून महायुतीने एक दीड टक्क्यांचा फरक भरून काढलेला आहे. आजच्या घडीला कुठलीच आघाडी विजयाचा दावा करू शकणार नाही. महाराष्ट्राची निवडणूक ही हरियाणाच्या धर्तीची नाही तर महाराष्ट्रालाच स्वतःचा आकार देणारी निवडणूक आहे. यामध्ये भाजपचा विजय झाला तर भाजपने राजकारणाची संपूर्ण कुस बदलून टाकली असं म्हणता येईल.
लाडकी बहिण कितपत यशस्वी?
महाराष्ट्रात आणि
देशातल्या पुरुषसत्ताक राजकीय व्यवस्थेमध्ये महिलांच्या राजकीय मतांना फारसं
महत्त्व मिळत नाही. त्यामुळे लाडकी बहीण योजनेचा एवढा मोठा परिणाम होईल असं
सध्यातरी दिसत नाही. यामुळे या १५०० रुपयांमुळे महिला त्यांचं राजकीय मत बनवू
शकतील आणि ते निर्णायक ठरेल असं चित्र सध्यातरी दिसत नाही. मात्र जिथे तिरंगी, चौरंगी,
पंचरंगी आणि काही ठिकाणी सप्तरंगी सुद्धा आहे त्याठिकाणी किमान २० ते २५ हजार मतांची
मदत ही महायुतीच्या उमेदवाराला मिळू शकतो.
बेरोजगारी, महागाई आणि उद्योग-धंदे गुजरात पळवणे हे मुद्दे कितपत यशस्वी ठरतील?
वेदान्ता फॉक्सकॉन, मेडिकल
डिव्हाइस पार्क, बल्ग ड्रगपार्क, टाटा एअरबस, मदर डेअरी, सेमीकंडक्टर डिव्हाइस कंपनी,
आर्थिक केंद्र गुजरातला नेणे, पालघर येथील पोलीस प्रशिक्षण केंद्र गुजरातला हलवणे,
हिरे व्यापार सुरतला नेणे यांसारख्या मुद्यांची निवडणुकीत चर्चा होती. आणखी एक
महत्त्वाच्या मुद्दा म्हणजे वाढत्या शहरीकरणामध्ये निर्माण होणाऱ्या सन्मानजनक
रोजगाराच्या अपुऱ्या संधींचा. मुंबई, नवी मुंबई, ठाणे ,कल्याण- डोंबिवली, भिवंडी,
पुणे, नाशिक, छ. संभाजीनगर आणि नागपूर ही काही मोजकी शहरे सोडली तर उर्वरित महाराष्ट्रात
मागच्या काही दशकांमध्ये वस्तूंची निर्मिती करणारे नवीन कारखाने सुरू झालेले
नाहीत. महाराष्ट्राचा भर या सेवाक्षेत्रावर राहिलेला आहे आणि यामध्ये गुंतलेल्या
व्यक्तींचा रोजगार हा कायमस्वरूपी नाही आणि याला सन्मानजनक स्थान देखील नाही.
यामुळे यंदाच्या निवडणुकीत असा रोजगार न मिळालेला मतदार काय करणार? यावरही बरच काही अवलंबून असणार आहे.
काँग्रेसची दुसरी फळी किती मजबूत किती कमकुवत?
लोकसभेप्रमाणे विधानसभा
निवडणुकीतही काँग्रेस हायकमांडने महाराष्ट्रातील विभागनिहाय स्थानिक नेतृत्वाला
अधिकार देत त्यांचे हात बळकट केले आहे. पश्चिम महाराष्ट्रात कोल्हापूरची जबाबदारी
ही सतेज पाटील या तगड्या नेत्याकडे दिली. त्यांनी सर्वाना जुळवून घेण्याचा प्रयत्न
करत बंडखोरी शमवण्याचा प्रयत्न केला. सांगलीत विश्वजीत कदम, सोलापुरात प्रणिती
शिंदे तसेच साताऱ्यात देखील त्यांनी पृथ्वीराज चव्हाण यांना बळ देणारे तरुण
कार्यकर्ते गोळा केले आहेत. मुंबईत वर्षा गायकवाड, अस्लम शेख, अमीन पटेल, सचिन
सावंत, नसीम खान यांच्यावर जबाबदारी टाकली. विदर्भात कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष
नाना पटोले असून त्यांनी भंडारा- गोंदियाची जबाबदारी स्विकारली आहे. गडचिरोलीमध्ये
डॉ. नामदेव किरसान आणि विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्यावर सोपवली आहे.
रामटेकची जबाबदारी ही सुनील केदार यांच्यावर असून नागपूरची विकास ठाकरे, नितीन
राऊत यांच्याकडे देण्यात आली. अमरावतीत यशोमती ठाकूर असून वर्धा, यवतमाळ आणि
वाशिमची जबाबदारी ही माणिकराव ठाकरे यांच्याकडे देण्यात आली आहे. मराठवाड्यात
लातूरमध्ये अमित देशमुख यांच्याकडे असून जालन्यात आणि नांदेडमध्ये अनुक्रमे कल्याण
काळे, खतगावकरांच्या मुलीकडे देण्यात आली. खान्देशात नंदुरबारची गोवाल पाडवी,
धुळ्यात कुणाल पाटील, नगरमध्ये सत्यजीत तांबे आणि बाळासाहेब थोरात यांच्याकडे मोठी
जबाबदारी दिली आहे.
बंडोबा किती झाले थंडोबा?
यंदाची निवडणूक ही १९९५ची
आठवण करून देणारी असेल असे काही राजकीय विश्लेषक सांगत आहेत. १९९५ला सर्वाधिक ४५
अपक्ष आमदार निवडून आले होते आणि इतर छोटे मोठे पक्ष यांची संख्या २५ होती.
त्यामुळे तशीच परिस्थिती आत्ताही होऊ शकते असे काही विश्लेषक म्हणत आहेत. यावेळी मायावतींचा
बहुजन समाज पक्ष यांनी सर्वाधिक २३७ उमेदवार उभे असून त्याखालोखाल २०० उमेदवार हे
प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीने उभे केले आहेत. जवळपास १५८ उमेदवार हे
राज ठाकरेंच्या मनसेचे असून त्यांचा प्रभाव हा मुंबई, कल्याण, ठाणे, नाशिक आणि
पुण्यातील काही भागात आहे. त्यात बच्चू कडू, राजू शेट्टी आणि संभाजीराजे भोसले
यांची तिसरी आघाडी देखील आपले भविष्य आजमावत आहे. काही छोटे पक्ष आणि मविआ,
महायुतीचे मिळून १३२ उमेदवार रिंगणात आहेत. त्यात महायुतीचे ६७ तर महाविकास
आघाडीचे ६५ उमेदवार कोणाची मते खाणार आणि त्याचा कोणाला फटका बसणार हे देखील
तितकेच महत्वाचे आहे.
यावेळेला होणाऱ्या
महाराष्ट्राच्या निवडणुकीबाबत दोन शब्द वापरायचे झाले तर ते म्हणजे 'अभूतपूर्व रणधुमाळी.' महाराष्ट्राच्या
राजकारणाचं जे काही अधःपतन झालेलं आहे त्याचं प्रतिबिंब आपल्याला या निवडणुकीत
दिसतंय. निवडणुकीतील उमेदवारांच्या याद्या बघितल्या तर हे लक्षात येईल. बंडखोरी ही
गोष्ट महाराष्ट्राला नवीन नाही. यंदाची निवडणूक आठवड्याच्या मधल्याच दिवशी ठेवल्याने
मतदानाचा टक्का वाढण्याची अपेक्षा निवडणूक आयोगासह विविध पक्षांनी ठेवली आहे.
प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी किती मतदारांना घराबाहेर काढण्यात यश मिळते यावर सारे
गणित अवलंबून असणार आहे.