Tuesday, 18 August 2026

मक्का करारामुळे भारताच्या आखाती रणनीतीसमोर नवे आव्हान?

 सौदी अरेबिया–पाकिस्तान–तुर्की यांच्यातील नव्या सुरक्षा समीकरणामुळे भारतासमोर आखाती प्रदेशात नवी रणनीतिक गुंतागुंत निर्माण होऊ शकते.


सौदी अरेबिया, पाकिस्तान आणि तुर्की यांच्यात झालेल्या नव्या संरक्षण करारामुळे दक्षिण आशिया आणि आखाती प्रदेशातील सुरक्षा समीकरणांना नवी दिशा मिळण्याची शक्यता आहे. या करारामुळे पाकिस्तानला आर्थिकदृष्ट्या सामर्थ्यवान सौदी अरेबिया आणि लष्करीदृष्ट्या प्रभावी तुर्की या दोन देशांचे औपचारिक सुरक्षा पाठबळ मिळाले आहे. त्यामुळे भारतासाठीही या बदलत्या समीकरणाचा बारकाईने विचार करणे आवश्यक ठरणार आहे.

मक्का येथे ७ ऑगस्ट रोजी झालेल्या या करारानुसार, तिन्हीपैकी कोणत्याही एका देशावर सशस्त्र हल्ला झाल्यास तो तिन्ही देशांवरील हल्ला मानला जाईल. मात्र हा करार नाटोसारखा स्वयंचलित लष्करी प्रतिसाद निश्चित करतो का, याबाबत अद्याप अनेक प्रश्न कायम आहेत. तुर्कीने या कराराच्या चौकटीत वरिष्ठ पातळीवर राजकीय आणि लष्करी समन्वय, संयुक्त लष्करी सराव तसेच संरक्षण उद्योगातील सहकार्य वाढवण्याची योजना मांडली आहे.

भारतासाठी आखाती हितसंबंध महत्त्वाचे

या नव्या समीकरणामुळे भारतासमोर सर्वात मोठे आव्हान आखाती प्रदेशातील आपल्या हितसंबंधांचे संतुलन राखण्याचे असेल. आखाती देश भारतासाठी केवळ ऊर्जा पुरवठ्याच्या दृष्टीने महत्त्वाचे नाहीत, तर व्यापार, गुंतवणूक आणि भारतीय नागरिकांच्या रोजगाराच्या दृष्टीनेही त्यांचे मोठे महत्त्व आहे.

दुसरीकडे, आखाती देशांमध्ये पाकिस्तानचा मोठा अनिवासी समुदाय आहे. या समुदायाकडून पाकिस्तानला मोठ्या प्रमाणावर रेमिटन्स मिळतात. त्यामुळे आखाती प्रदेश हा पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेसाठी तसेच ऊर्जा सुरक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. भविष्यात भारत आणि पाकिस्तान यांच्यात पुन्हा लष्करी संकट निर्माण झाल्यास आखाती देशांचा त्यात प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष सहभाग वाढण्याची शक्यता भारतासाठी अतिरिक्त गुंतागुंत निर्माण करू शकते.

विशेषतः पाकिस्तानवर झालेला 'हल्ला' नेमका कोणत्या स्वरूपाचा मानायचा, याबाबत भविष्यात निर्माण होणारी संदिग्धता भारताच्या रणनीतिक गणितावर परिणाम करू शकते. सौदी अरेबिया आणि तुर्की यांना प्रत्यक्ष संघर्षात सहभागी होण्याची इच्छा नसली, तरी करारामुळे निर्माण झालेली औपचारिक सुरक्षा बांधिलकी परिस्थिती अधिक गुंतागुंतीची करू शकते.



नौदल विस्ताराला मिळू शकते नवी चालना

या करारातील तिन्ही देश महत्त्वाच्या समुद्री मार्गांच्या आसपास आहेत. सौदी अरेबियाचे स्थान लाल समुद्र आणि आखाती प्रदेशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे, तर तुर्की भूमध्य आणि काळ्या समुद्राच्या परिसरात रणनीतिक स्थानावर आहे. पाकिस्तानचे अरबी समुद्रातील स्थान भारतासाठी विशेष महत्त्वाचे आहे.

या पार्श्वभूमीवर भारतासाठी हिंदी महासागर क्षेत्रातील नौदल क्षमता वाढवणे, समुद्री मार्गांवर लक्ष ठेवणे आणि आखाती देशांसोबत सागरी सुरक्षेचे सहकार्य अधिक मजबूत करणे महत्त्वाचे ठरू शकते. मक्का करारामुळे भारताला नौदल विस्ताराला प्राधान्य देण्यामागे आणखी एक रणनीतिक कारण मिळाले आहे, असे तज्ज्ञांचे मत आहे.

करार किती प्रभावी ठरणार?

मात्र या करारामुळे लगेचच दक्षिण आशिया किंवा मध्यपूर्वेतील सत्तासमतोल पूर्णपणे बदलला आहे, असे मानणे घाईचे ठरेल. या कराराचे प्रत्यक्ष परिणाम किती व्यापक असतील, हा महत्त्वाचा प्रश्न आहे.

हडसन इन्स्टिट्यूटचे हुसेन हक्कानी यांच्या मते, या कराराचे महत्त्व सध्या प्रत्यक्ष लष्करी परिणामांपेक्षा प्रतीकात्मक स्वरूपाचे अधिक आहे. त्यांच्या मते, परस्पर संरक्षण कराराचा पाया सामान्यतः सामायिक शत्रू किंवा स्पष्ट सामायिक धोका असतो. मात्र या तिन्ही देशांना एकत्र बांधणारा असा एकच समान शत्रू स्पष्टपणे दिसत नाही.

याशिवाय अफगाणिस्तान, इराण किंवा येमेनमधील हुथी बंडखोरांशी संबंधित संघर्षांसारख्या प्रादेशिक वादांमध्ये एकमेकांच्या बाजूने थेट सहभागी होण्याबाबत पाकिस्तान आणि सौदी अरेबियाने यापूर्वीही सावध भूमिका घेतली आहे. त्यामुळे करार झाला असला तरी प्रत्येक संघर्षात तिन्ही देश एकत्रितपणे लष्करी कारवाई करतीलच, असे मानता येणार नाही.

पाकिस्तानला मिळाले नवे रणनीतिक वजन

तरीही पाकिस्तानच्या दृष्टीने या कराराचे महत्त्व कमी लेखता येणार नाही. आर्थिक संसाधने, ऊर्जा आणि राजनैतिक प्रभावाच्या बाबतीत महत्त्वपूर्ण असलेल्या सौदी अरेबियासोबतचे संरक्षण संबंध अधिक संस्थात्मक झाले आहेत. त्याच वेळी तुर्कीच्या संरक्षण तंत्रज्ञानाचा आणि लष्करी अनुभवाचा पाकिस्तानला फायदा होऊ शकतो.

या समीकरणात चीनची भूमिकाही महत्त्वाची आहे. पाकिस्तानच्या संरक्षण व्यवस्थेत चीन हा प्रमुख भागीदार आहे. पाकिस्तानच्या शस्त्रास्त्रांपासून तंत्रज्ञान आणि पायाभूत सुविधांपर्यंत चीनचा प्रभाव मोठा आहे. त्यामुळे मक्का कराराकडे केवळ सौदी अरेबिया, तुर्की आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध म्हणून पाहणे पुरेसे ठरणार नाही. या कराराच्या व्यापक भू-राजकीय परिणामांमध्ये चीनचा घटकही विचारात घ्यावा लागेल.

भारताची रणनीती काय असावी?

या बदलत्या परिस्थितीत भारताने सौदी अरेबियाशी असलेले संबंध अधिक मजबूत करण्यावर भर देणे आवश्यक आहे. रियाधमधील आपला राजनैतिक आणि आर्थिक प्रभाव कायम ठेवणे, संरक्षण सहकार्य वाढवणे आणि आखाती देशांसोबत बहुआयामी संबंध विकसित करणे ही भारताची प्राथमिकता असू शकते.

भारताने यापूर्वीच इस्रायल, संयुक्त अरब अमिराती आणि इंडोनेशियासारख्या देशांसोबत संरक्षण आणि रणनीतिक सहकार्य वाढवले आहे. भविष्यात सौदी अरेबियासोबतही व्यावसायिक तसेच संरक्षणविषयक सहकार्य सुरू ठेवण्याची शक्यता आहे.

यामागे एक व्यापक रणनीती दिसते. बदलत्या भू-राजकीय वातावरणात कोणत्याही एका देशावर किंवा गटावर अवलंबून राहण्याऐवजी विविध देशांसोबत संबंध मजबूत करून संभाव्य आर्थिक आणि सुरक्षा धोक्यांचा परिणाम कमी करणे. आंतरराष्ट्रीय संबंधांमध्ये यालाच 'हेजिंग' किंवा जोखीम-विविधीकरणाची रणनीती म्हणता येईल.




सत्तासमतोल की रणनीतिक गणित?

अखेर मक्का करारामुळे खरोखरच सत्तासमतोल बदलणार आहे की भारतासह सर्व संबंधित देशांच्या रणनीतिक गणितात केवळ एक नवा घटक जोडला जाणार आहे, हा महत्त्वाचा प्रश्न आहे.

करारामुळे पाकिस्तानला निश्चितच नवे राजनैतिक आणि सुरक्षा वजन मिळाले आहे. सौदी अरेबियाला अमेरिकेव्यतिरिक्त संरक्षण भागीदारीत विविधता आणण्याची संधी मिळते, तर तुर्कीला आखाती आणि दक्षिण आशियातील आपला रणनीतिक प्रभाव वाढवण्याची संधी मिळते. मात्र या कराराची प्रत्यक्ष लष्करी क्षमता आणि तिन्ही देशांची एकमेकांसाठी असलेली बांधिलकी भविष्यातील एखाद्या गंभीर संकटातच स्पष्ट होईल.

भारतासाठी त्यामुळे घाईघाईने प्रतिक्रिया देण्यापेक्षा आखाती प्रदेशातील आपले हितसंबंध सुरक्षित ठेवणे, सौदी अरेबियासोबतचे संबंध अधिक दृढ करणे, संरक्षण भागीदारीचा विस्तार करणे आणि हिंदी महासागरातील आपली समुद्री क्षमता वाढवणे अधिक महत्त्वाचे ठरणार आहे.

म्हणजेच, मक्का करार हा भारतासाठी तातडीचा लष्करी धोका नसला तरी बदलत्या आखाती आणि दक्षिण आशियाई सुरक्षा समीकरणाचे गांभीर्य अधोरेखित करणारा महत्त्वाचा रणनीतिक संकेत नक्कीच आहे.



अरुणाचलमध्ये चीनची घुसखोरी? सीमावादामुळे भारत-चीन संबंध पुन्हा तणावाच्या छायेत

 अरुणाचल प्रदेशातील काही स्थानिक राजकीय नेते आणि प्रतिनिधींनी तयार केलेल्या एका तथ्यशोधन अहवालात असा दावा करण्यात आला की चीनने काही भागांत भारतीय सैन्याच्या गस्तीवर निर्बंध आणले आहेत आणि काही ठिकाणी प्रत्यक्ष भूभागावर अतिक्रमण केले आहे.



भारत आणि चीन यांच्यातील सीमावाद पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे. अरुणाचल प्रदेशातील Upper Subansiri जिल्ह्यातील Taksing परिसरात चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीने (PLA) भारतीय सैन्याला काही महत्त्वाच्या गस्तीच्या ठिकाणी जाण्यापासून रोखल्याचा दावा एका तथ्यशोधन पथकाने केला आहे. या दाव्यामुळे दिल्लीतील राजकीय वातावरण तापले असून, विरोधकांनी केंद्र सरकारकडून स्पष्टीकरणाची मागणी केली आहे. मात्र, भारतीय सुरक्षा यंत्रणा आणि अरुणाचल प्रदेश सरकारने चीनच्या नव्या घुसखोरीचे दावे फेटाळले आहेत. त्यामुळे नेमके वास्तव काय, हा प्रश्न महत्त्वाचा ठरतो.

नेमका वाद काय आहे?

People's Party of Arunachal (PPA) या प्रादेशिक राजकीय संघटनेच्या तथ्यशोधन पथकाने Taksing आणि त्याच्या आसपासच्या भागातील परिस्थितीचा आढावा घेतला. या पथकाचा दावा आहे की, LAC म्हणजेच प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळील काही भागांमध्ये चिनी सैन्याची उपस्थिती वाढली आहे. पारंपरिकरीत्या भारतीय नागरिक वापरत असलेल्या चराई आणि शिकारीच्या क्षेत्रांवरही चीनचा प्रभाव वाढत असल्याचे या पथकाने म्हटले आहे.

या दाव्यांमध्ये विशेषतः Shera Point 5 या गस्तीच्या ठिकाणाचा उल्लेख करण्यात आला आहे. भारतीय जवानांना काही भागात नियमित गस्त घालता येत नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. या दाव्यांमुळे सीमावर्ती भागातील नागरिकांमध्येही चिंता निर्माण झाली आहे.




सरकार आणि लष्कराचा वेगळा दावा

मात्र, या आरोपांना अधिकृत पातळीवर दुजोरा मिळालेला नाही. भारतीय संरक्षण अधिकाऱ्यांनी आणि सरकारशी संबंधित सूत्रांनी अरुणाचल प्रदेशात चीनकडून नव्याने भारतीय भूभागावर अतिक्रमण झाल्याचे वृत्त फेटाळले आहे. सोशल मीडियावर फिरणारे काही दावे पुराव्याविना असल्याचेही सरकारी सूत्रांनी म्हटले आहे.

अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री पेमा खांडू आणि राज्याचे गृहमंत्री मामा नाटुंग यांनीही Taksing परिसरातील चिनी अतिक्रमणाच्या बातम्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. राज्य सरकारने यापूर्वी अशा दाव्यांना सोशल मीडिया अफवा आणि दिशाभूल करणारे वृत्त असे संबोधले होते.

यामुळे सध्या दोन परस्परविरोधी चित्रे समोर येत आहेत. एका बाजूला स्थानिक राजकीय संघटना आणि काही नेते चिनी सैन्याच्या वाढत्या उपस्थितीचा दावा करत आहेत; तर दुसऱ्या बाजूला केंद्र आणि राज्य सरकारकडून नव्या घुसखोरीचा दावा नाकारला जात आहे.




राहुल गांधींचा केंद्रावर हल्लाबोल

या प्रकरणाने राजकीय रंगही घेतला आहे. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी अरुणाचल प्रदेशातील काही भागांत भारतीय सैन्याला गस्त घालण्यापासून चीनने रोखल्याचा आरोप केला. त्यांनी केंद्र सरकारकडे याबाबत स्पष्टीकरण मागितले आणि सरकार या विषयावर मौन का बाळगत आहे, असा सवाल केला.

माजी केंद्रीय मंत्री आर. के. सिंह यांनीही सरकारकडे प्रश्न उपस्थित करत Shera Point 5 व्यतिरिक्त आणखी कोणती गस्तीची ठिकाणे भारतीय सैन्याच्या नियंत्रणाबाहेर गेली आहेत का, याचे स्पष्टीकरण मागितले.

मात्र सरकारकडून भारतीय भूभाग चीनच्या ताब्यात गेल्याचा दावा स्पष्टपणे नाकारण्यात आला आहे. त्यामुळे हा वाद केवळ सीमावर्ती भागापुरता मर्यादित न राहता देशाच्या राजकीय चर्चेचाही विषय बनला आहे.

चीनची भूमिका काय?

चीनकडूनही अरुणाचल प्रदेशाबाबत भारताच्या भूमिकेला सातत्याने विरोध केला जातो. चीन अरुणाचल प्रदेशातील मोठ्या भागावर दावा करतो आणि या प्रदेशाला 'दक्षिण तिबेट' असे संबोधतो. भारत मात्र अरुणाचल प्रदेश हा देशाचा अविभाज्य आणि अविभाज्य भाग असल्याचे स्पष्टपणे सांगतो.

सध्याच्या वादाच्या पार्श्वभूमीवर चीनने भारत-चीन सीमावर्ती परिस्थिती सर्वसाधारणपणे स्थिर असल्याचे म्हटले आहे. त्याच वेळी दोन्ही देशांनी संवाद कायम ठेवून सीमावर्ती शांतता टिकवण्यावर भर दिला आहे.

LAC मुळे समस्या का निर्माण होते?

भारत-चीन सीमावादातील एक महत्त्वाची समस्या म्हणजे दोन्ही देशांमधील प्रत्यक्ष नियंत्रण रेषा अर्थात LAC पूर्णपणे परस्पर मान्य आणि जमिनीवर स्पष्टपणे चिन्हांकित नाही. त्यामुळे काही भागांमध्ये दोन्ही देशांच्या गस्तीचे मार्ग एकमेकांना छेदतात. (The Lines are mix-up between each other)

अशा परिस्थितीत एखाद्या भागात सैन्याची गस्त, तात्पुरती चौकी, रस्ता किंवा पायाभूत सुविधा उभारण्याच्या हालचालींवरून दोन्ही बाजूंमध्ये मतभेद निर्माण होऊ शकतात. Taksingसारखा दुर्गम आणि डोंगराळ भाग यामुळेच सामरिकदृष्ट्या महत्त्वाचा ठरतो.

भारत-चीन संबंधांसाठी नवा कसोटीचा क्षण 

या संपूर्ण प्रकरणाची वेळही महत्त्वाची आहे. भारत आणि चीन यांच्यातील संबंध 2020 मधील गलवान संघर्षानंतर मोठ्या तणावातून गेले. त्यानंतर दोन्ही देशांनी सीमावर्ती भागातील तणाव कमी करण्यासाठी अनेक पातळ्यांवर चर्चा केली. 2024 नंतर संबंध सुधारण्याचे प्रयत्न सुरू झाले असताना अरुणाचलमधील नव्या आरोपांमुळे त्या प्रक्रियेवर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

विशेष म्हणजे, सप्टेंबरमध्ये नवी दिल्ली येथे BRICS शिखर परिषद होणार असून चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्या भारत दौऱ्याकडेही लक्ष लागले आहे. अशा परिस्थितीत सीमावादासंबंधी कोणतीही नवीन घटना दोन्ही देशांच्या राजनैतिक संबंधांसाठी संवेदनशील ठरू शकते.

निष्कर्ष

अरुणाचल प्रदेशातील Taksing परिसरातील सध्याचा वाद हा केवळ चीनने भारतीय भूभागावर अतिक्रमण केले की नाही, एवढ्यापुरता मर्यादित नाही. सीमावर्ती भागातील प्रत्यक्ष परिस्थिती, गस्तीच्या अधिकारांवरील मतभेद, स्थानिक नागरिकांच्या चिंता आणि भारत-चीन संबंधांचा व्यापक राजनैतिक संदर्भ या सर्व बाबी त्यामागे आहेत.

सध्या चिनी अतिक्रमणाचा दावा आणि त्याचे सरकारी खंडन अशी दोन परस्परविरोधी मते समोर आहेत. त्यामुळे अधिकृत आणि स्वतंत्र पुराव्यांशिवाय कोणताही निष्कर्ष काढणे घाईचे ठरेल. मात्र, या वादामुळे एक गोष्ट स्पष्ट झाली आहे. भारत-चीन सीमेवरील शांतता अजूनही अत्यंत नाजूक आहे आणि अरुणाचल प्रदेशातील कोणतीही हालचाल दोन्ही देशांच्या संबंधांवर थेट परिणाम करू शकते.

Wednesday, 15 October 2025

नोकरदारांसाठी मोठी संधी! ईपीफओ ने बदलले तब्बल १३ नियम, संयमाने मिळेल मोठा वाटा

 

ईपीफओ निधी संघटनेने त्यांच्या नियमात काही महत्वपूर्ण बदल केले आहेत. या बदलाचा उद्देश कामगारांना सामाजिक सुरक्षा प्रदान करणे आणि त्यांना दीर्घकालीन लाभांपासून वंचित राहण्यापासून रोखणे हा आहे.


कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (EPF) ही भारतातील सर्व पगारदार कर्मचाऱ्यांसाठी निवृत्ती बचत योजना आहे. कामगार आणि रोजगार मंत्रालयाच्या अंतर्गत येणारी कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) याच्या माध्यमातून या योजनेचे काम चालते. ही योजना नियोक्ता (Employer) – कर्मचारी (Employee) यांच्या योगदानातून कर्मचार्‍यांच्या आर्थिक सुरक्षिततेची काळजी घेते आर्थिक सुरक्षितता सुनिश्चित करते. या योजनेत नियोक्ता आणि कर्मचारी हे दोघेही कर्मचार्‍याच्या मूळ वेतनाच्या १२ टक्क्यांचे योगदान या निधीसाठी देतात, ज्यामधून पेन्शन, विमा आणि निवृत्तिच्या वेळी एकदाच मोठी रक्कम काढणे अशा स्वरुपाचे फायदे मिळतात. याच संघटनेने आता कामगारांना सामाजिक सुरक्षा प्रदान करता यावी म्हणून त्यांच्या नियमात काही महत्वपूर्ण बदल केले आहेत.

ईपीफओ निधी संघटनेने आपल्या सदस्यांसाठी एक मोठा निर्णय घेतला आहे. आता, बेरोजगारीच्या बाबतीत, भविष्य निर्वाह निधी (EPF) मधून संपूर्ण रक्कम काढण्यासाठी १२ महिने वाट पहावी लागेल. तर, पेन्शन खात्यातून पैसे काढण्यासाठी ३६ महिने वाट पहावी लागेल. पूर्वी हा कालावधी फक्त दोन महिने होता. गेल्या सोमवारी झालेल्या ईपीफओच्या केंद्रीय विश्वस्त मंडळाच्या (CBT) बैठकीत हा बदल करण्यात आला. केंद्रीय कामगार मंत्री मनसुख मांडविया यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. या पावलाचा मुख्य उद्देश कामगारांना सामाजिक सुरक्षा प्रदान करणे आणि त्यांना दीर्घकाळ पेन्शनसारख्या फायद्यांपासून वंचित राहण्यापासून रोखणे आहे. पूर्वी, जर एखादा कर्मचारी सलग दोन महिने बेरोजगार असेल तर तो त्याच्या भविष्य निर्वाह निधी आणि पेन्शन खात्यातून संपूर्ण रक्कम काढू शकत होता. मात्र, आता हा नियम बदलण्यात आला आहे.



तीन श्रेणीत १३ नियमांची केली विभागणी

पूर्वी पैसे काढण्यासाठी सरकारने वेगवेगळे १३ गुंतागुंतीचे नियम बनवले होते, ज्यांना सोपं करून त्यांची तीन श्रेणींमध्ये विभागणी करण्यात आली आहे. ती पुढीलप्रमाणे-

अत्यावश्यक गरजा (आजारपण, शिक्षण, लग्न)

घराशी संबंधित कामे

विशेष/अपवादात्मक परिस्थिती

कामगार मंत्री मनसुख मांडवीय यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी झालेल्या केंद्रीय विश्वस्त मंडळाच्या बैठकीत पीएफ मधून पैसे काढण्याच्या प्रक्रियेबाबत अनेक मोठे निर्णय घेण्यात आले. ईपीएफ सदस्यांचं जीवन सुलभ करण्यासाठी केंद्रीय विश्वस्त मंडळाने काही प्रमाणात रक्कम काढण्याच्या तरतुदींमध्ये सुटसुटीतपणा आणण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार ईपीएफओचे सदस्य त्यांच्या भविष्य निर्वाह निधी खात्यातील कर्मचारी आणि कंपनी अशा दोघांचा हिस्सा मिळून एकूण उपलब्ध शिल्लक रक्कम पूर्णपणे काढू शकतील.

बदललेल्या नियमानुसार कर्मचारी आता शिक्षणासाठी १० वेळा आणि लग्नासाठी ५ वेळा पैसे काढू शकतील. याआधी शिक्षण आणि लग्नासाठी एकूण ३ वेळा पैसे काढण्याची परवानगी होती. आंशिक रक्कम काढण्यासाठीचा कालावधीही कमी करून १२ महिने करण्यात आला आहे. पूर्वी त्यासाठी किमान ५ वर्षांची सेवा आवश्यक होती.

खातेधारकांना त्यांच्या खात्यात किमान २५ टक्के रक्कम शिल्लक ठेवणे आवश्यक आहे, जेणेकरून त्यांना ८.२५ टक्के व्याज आणि चक्रवाढ व्याजासह इतर फायदे मिळू शकतील. त्यामुळे ईपीएफओ खातेधारक गरज पडल्यास पैसे काढू शकतील, तसेच निवृत्ती निधीचे फायदे देखील राखू शकतील.



पाच वर्षांआधी तुम्ही तुमचा ईपीएफ का काढू शकत नव्हता त्याची कारणे:

१. तुमच्या रकमेवर कर आकारला जाईल – जर तुम्ही पाच वर्षांपूर्वी तुमच्या ईपीएफमधून कोणतीही रक्कम काढली, तर तुम्ही काढलेली रक्कम तुमच्या करपात्र उत्पन्नात जोडली जाईल. तसेच, जर पाच वर्षापूर्वी तुम्ही काढलेली रक्कम ५०,००० रुपयांपेक्षा जास्त असेल, तर ती रक्कम १०% कर सवलतीस पात्र आहे. पण, जर तुम्ही तुमच्या आयकर रिटर्नसह १५जी किंवा आयटी फॉर्म सबमिट केलात, तर तुम्हाला ही रक्कम भरण्यापासून सूट मिळू शकते.

२. तुम्हाला कलम ८०सी चे फायदे मिळणार नाहीत – जर तुम्ही कलम ८०सी अंतर्गत तुमच्या पीएफ अकाउंटमधून संपूर्ण ईपीएफ काढून घेतला, तर तुमच्या पगारावर मिळणाऱ्या व्याजावर इतर स्रोतांमधून मिळणाऱ्या उत्पन्नाप्रमाणे कर आकारला जाईल.

यासह खातेधारकांना 'विशिष्ट परिस्थितींमध्ये' कोणतेही कारण न देता पैसे काढता येतील. पूर्वी विशिष्ट परिस्थिती' म्हणजे नैसर्गिक आपत्ती, लॉकडाउन किंवा आस्थापन बंद पडल्यास, बेरोजगारी, महामारी अशा वेळेस स्पष्ट कारण द्यावं लागत होतं. त्यामुळे अनेक अर्ज फेटाळले जात होते, आता मात्र तसे होणार नाही. 

पारंपरिक गुंतवणुकीला आधुनिकतेचा साज, यंदाच्या दिवाळीला सोने खरेदीचा 'हा' आहे उत्तम पर्याय

सोन्याचे दर सध्या विक्रमी उच्चांकावर पोहचले आहेत. भारतासारख्या देशात सोन्यात आज गुंतवणुकीत अनेक पर्याय उपलब्ध असून मध्यमवर्गीयांना खिशाला परवडतील अशा गोष्टी आपण जाणून घेऊयात.


भारतात पारंपारिकपणे सोन्याला खूप महत्त्व आहे. सणासुदीच्या काळात सोने खरेदी करण शुभ मानलं जातं. सोन्याच्या दागिन्यांसाठी भारताइतकी वेड क्वचितच इतर कोणत्याही देशात आढळून येईल. शिवाय, सोने नेहमीच सुरक्षित गुंतवणूक मानले जाते. आता काळ बदलला असून लोक पारंपारिक सोन्यापेक्षा डिजिटल सोन्याकडे अधिकाधिक वळत आहेत. लॉकर किंवा सुरक्षिततेची चिंता न करता तुम्ही डिजिटल सोन्यात गुंतवणूक करू शकता.

डिजिटल इंडियाच्या काळात मोबाईल अॅप्स किंवा ऑनलाइन प्लॅटफॉर्म सारखे अनेक पर्याय असून त्या द्वारे ग्राहक खरेदी शकता, अगदी कमी रकमेत देखील. दुसरीकडे, नियमित सोने खरेदी करणे, त्याची शुद्धता तपासणे आणि घरात ठेवणे यात अडचणी निर्माण करते. म्हणूनच, आता बरेच लोक डिजिटल सोन्यात गुंतवणूक करत आहेत. अनेकांना प्रश्न पडतो की खरा फायदा कोणता आहे: डिजिटल सोने की पारंपारिक सोने खरेदीला प्राधान्य देणे? चला समजावून घेऊया.



डिजिटल सोने खरेदीचे काय फायदे आहेत?

आजकाल, मध्यमवर्गीय आणि उच्च मध्यमवर्गीय लोक पारंपारिक सोन्याचे दागिने खरेदी करण्याऐवजी डिजिटल सोन्यात गुंतवणूक करत आहेत. डिजिटल सोन्यात गुंतवणूक करण्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे तुम्हाला ते खऱ्या सोन्यासारखे घरी साठवण्याची गरज नाही. तुम्ही तुम्हाला हवे तेवढे सोने खरेदी करू शकता, अगदी १०० रुपयांचेही. ही गुंतवणूक २४ कॅरेट शुद्ध सोन्यात केली जाते.

पेटीएम, गुगल पे आणि फोन पे सारख्या विविध प्लॅटफॉर्मवरून डिजिटल सोन्याची खरेदी करता येते, जे घरपोच उपलब्ध होते आणि भविष्यात गरज भासल्यास ते सहजरित्या विकले जाऊ शकते. डिजिटल गोल्ड बॉंड सारखा देखील ग्राहकांसमोर उपलब्ध आहे.  सोने सुरक्षित तिजोरीत ठेवण्याची गरज नसल्याने ते चोरी किंवा नुकसान होण्याची भीती नसते. शिवाय, ते गुंतवणूक सरळता निर्माण करते, म्हणजेच गरज पडल्यास ते लवकर रोखीत रूपांतरित केले जाऊ शकते. यामुळे लहान गुंतवणूकदारांसाठी हा एक चांगला पर्याय बनतो.



पारंपारिक सोने खरेदीचे फायदे? 

डिजिटल सोन्याच्या तुलनेत, पारंपारिक सोने खरेदीचेही फायदे आहेत. डिजिटल सोने डिजिटल पद्धतीने साठवले जाते. तुम्ही ते कुठेही घेऊन जाऊ शकत नाही किंवा वापरू शकत नाही. लग्नसराई, सणसमारंभ आणि घरगुती कार्यक्रमात महिलांना याचे अधिक आकर्षण असल्याने ते अंगावर परिधान करता येतात. लोक ते केवळ गुंतवणूक म्हणून पाहत नाहीत तर कुटुंबाची मालमत्ता म्हणून देखील याकडे पाहतात.

सोन्याचे दागिने कर्ज मिळविण्यासाठी सहजपणे तारण ठेवता येतात. जेव्हा बाजारभाव वाढतात तेव्हा ते नफा मिळविण्यासाठी विकता येतात. बरेच लोक दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी भौतिक स्वरूपातील सोने अधिक खरेदी करतात कारण त्यांना त्यात स्थिरता वाटते पण तितकेच ते धोक्याचे देखील आहे. जर तुम्हाला सुरक्षित मालमत्ता हवी असेल तर डिजिटल सोने श्रेयस्कर आहे. दुसरीकडे, परंपरा आणि भावनिक मूल्याच्या बाबतीत, सामान्य सोने अजूनही त्याचे स्थान राखून ठेवते.

भारतीय संस्कृतीसाठी सोने म्हणजे मान, सन्मान, प्रतिष्ठा मानली जाते. त्याचा संचय करणे व शुभ प्रसंगी त्याचे आभूषणांच्या रूपात प्रदर्शन करून त्याद्वारे स्वत:ची कीर्ती वाढवणे, श्रीमंतीची ताकद दाखवणे, उच्च सामाजिक स्तराचा पुरावा देणे आणि यासगळ्यासाठी सुवर्णाहून श्रेष्ठ इतर काही क्वचितच मानले जात असे. त्यामुळे त्याकाळी गुंतवणूक म्हणून त्याचा वापर वा व्यापार हा काही विशिष्ट सामाजिक, व्यापारी वर्ग करत असे. या धातूच्या संचयनाला ‘डेड इन्व्हेस्टमेंट’ म्हणून बोल लावले गेले. परंतु परिस्थिती बदलायला वेळ लागत नाही. भारतातील त्याच्या, प्रती – तोळा किंमतीचा चढता आलेख बघितला तर आजच्या अर्थव्यवस्थेत याहून अधिक फायदेशीर गुंतवणूक अभावानेच सापडेल.

 


Monday, 18 November 2024

प्रचाराच्या तोफा थंडावल्या, महाराष्ट्राच्या सत्तेच्या चाव्या कोणाच्या हाती जाणार? दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला...


 

लोकसभेपेक्षा विधानसभा निवडणुकीचा प्रचार जरा जास्तच करण्यात आला आहे. डिजिटल जाहिरातींनी तर मोबाईलवर धुमाकुळ घातला. एकेका उमेदवाराचे अनेकदा फोन आल्याने मतदार ते फोन उचलून वैतागले आहेत.

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक प्रचाराची आज सांगता झाली. दोन्ही बाजूच्या आघाडी आणि युती यांच्यातील प्रमुख सहा पक्ष तसेच इतर छोटे-मोठे पक्ष, तिसरी आघाडी, अपक्ष उमेदवार यांनी जोरदार प्रचार केला. राज्यातील उमेदवार, नेते यांच्या सभा, आरोप-प्रत्यारोप याबाबतच्या सर्व भाषणं ही प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे मतदारांनी पाहिली आणि ऐकली आहेत. महाराष्ट्रातील प्रमुख दोन पक्ष शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस फुटल्यानंतरची ही पहिली विधानसभा निवडणूक आहे. मराठा आरक्षण, मराठा विरुद्ध ओबीसी असं झालेलं जातींमधील ध्रुवीकरण, लाडकी बहिण सारखी योजना, आणि शेतीचे प्रश्न या भोवती ही निवडणूक फिरत आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.

दिवाळीनंतर खरी महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात झाली होती. यंदा घरोघरी प्रचार करण्यापेक्षा डिजिटलीच जास्त प्रचार केला गेला. फारतर दोन-तीन उमेदवारांचे कार्यकर्ते घरा घरात प्रचाराला गेले असतील. परंतू, उमेदवारांच्या रेकॉर्डेड कॉलनी मतदारांना एवढे भंडावून सोडलेले. यावेळच्या विधानसभा निवडणुकीतील राजकीय पक्षांच्या जाहिराती कमालीच्या आक्रमक आहेत. महाविकास आघाडीने थेट निशाणा साधलाय तर महायुतीने पुन्हा एकदा हिंदू कार्ड वापरून राजकीय ध्रुवीकरणाचा जुना पत्ता टाकला आहे. मतदार आता कशाला प्राधान्य देणार हे २० तारखेला निश्चित होईल. मात्र एक प्रश्न पुन्हा पुन पडतोय, आपली लोकशाही प्रगल्भ होतेय की, आपण पुन्हा मागेच निघालोय. आज सायंकाळी ६ वाजल्यापासून प्रचाराच्या तोफा थंडावल्या असून आता रात्र वैऱ्याची आहे असे म्हणत आता चुकीच्या गोष्टी, गैरप्रकाराला आळा घालण्यासाठी पाळत ठेवली जाणार आहे. थोडक्यात कंदील प्रचार सुरु होणार. 

लोकसभेपेक्षा विधानसभा निवडणुकीचा प्रचार जरा जास्तच हायटेक करण्यात आला आहे. डिजिटल जाहिरातींनी तर मोबाईलवर धुमाकुळ घातला. एकेका उमेदवाराचे अनेकदा फोन आल्याने मतदार ते फोन उचलून वैतागले. अनेकदा तुम्ही काही वर्षांपूर्वी वेगळ्या मतदारसंघात खरेदी केली किंवा तिथे राहत असाल तर त्या मतदारसंघातल्या उमेदवारांचेही फोन आलेले आहेत.



विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा आज शेवटचा दिवस असून सर्व नेत्यांनी आपापल्या मतदारसंघात सांगता सभांचं आयोजन केलं आहे. सर्वच पक्षांनी या निवडणुकीत जोरदार कंबर कसलेली दिसत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष व ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी त्यांच्या पक्षाचे बारामतीचे उमेदवार युगेंद्र पवार यांच्यासाठी बारामतीत सभेचं आयोजन केलं होतं. या सभेत त्यांनी शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा प्रश्न मांडला. तसंच लाडकी बहीण योजनेवरुनही सरकारवर टीका केली. शेतकऱ्यांच्या डोक्यावरचं कर्ज फेडणं या सरकारला जमलेलं नाही. शेतमालाला किंमत द्यायची नाही, निर्यातबंदी लादायची हे या सरकारचं धोरण आहे असं शरद पवार यांनी म्हटलं आहे. दुसरीकडे भाजपचे नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पावसात भिजून निवडणूक जिंकता येत नाही असा टोला लगावला. दुसरीकडे गद्दार विरुद्ध खुद्दार असा प्रचार दोन्ही शिवसेनेत रंगलेला पाहायला मिळाला. कॉग्रेसने संविधान बचावचा नारा दिला.

या निवडणुकीत कोणता फॅक्टर चालणार?

अवघ्या काही महिन्यांपूर्वी जून मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला मिळालेल्या यशानंतर विधानसभेतही याच विजयाची पुनरावृत्ती होऊ शकते असा विश्वास अनेक राजकीय निरीक्षकांनी लोकसभेनंतर व्यक्त केला होता. मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वातील महायुती सरकारने राज्यभर विविध योजना आणि महामंडळं लागू करून निवडणुकीत परतण्याचा प्रयत्न केला आहे.

२०१४ नंतर महाराष्ट्रात भाजप हा एक मोठा पक्ष म्हणून उदयाला आला. त्यामुळे या निवडणुकीत भारतीय जनता पक्ष हा वर्चस्वशाली पक्ष म्हणून उदयाला येण्याचा प्रयत्न करेल. यात दुसरी शक्यता अशी आहे की, सध्या ज्या पद्धतीने युती आणि आघाडीचं राजकारण आहे, त्याच पद्धतीने हे राजकारण पुढची पाच ते दहा वर्षं चालू शकतं. तिसरा फॅक्टर हा आहे की सध्या राज्यात अनेक छोटे पक्ष उदयास आले आहेत, त्यामुळे निकालानंतर एक मोठा पक्ष आणि असे छोटे पक्ष एकत्र येऊन एक नवीन समीकरण तयार होऊ शकतं.

निवडणुकीत शेतीचे प्रश्न खूप महत्वाचे ठरतील. सोयाबीन, ऊस, कापूस आणि कांद्याचे प्रश्न महत्त्वाचे ठरू शकतील. ही पिकं घेणाऱ्या शेतकऱ्यांचा अडचणी या निवडणुकीच्या निकालावर परिणाम करू शकतात. सध्या लोकांचं आयुष्य सुखी नाही हा जो मुद्दा आहे, तो कुठेतरी लोकांच्या मनात राहणार आहे. कोणताच राजकीय पक्ष आपल्याला हे देत नाही हे जरी खरं असलं. तरी त्याची झळ नेहमी जास्त करून राज्यकर्त्यांना बसते.

राज्यभर मराठा विरुद्ध ओबीसी वाद 

मनोज जरांगे पाटील आणि लक्ष्मण हाके यांच्या मराठा आंदोलनामुळे राज्यभर जो मराठा विरुद्ध ओबीसी वाद पेटला आहे त्याचा सुद्धा परिणाम होऊ शकतो. महाराष्ट्राच्या निवडणुकीत जात हा घटक सर्वात जास्त परिणाम करणार आहे. महाराष्ट्रात जातीवादाचं रूप नाही परंतु जात ही आरक्षणाच्या आणि प्रदेशाच्या अंगाने खूप महत्त्वाची झालेली आहे. म्हणजे तुम्ही मराठवाड्याचा विचार केला तर तिथे जरांगे पाटील यांचं आरक्षणासाठीचं आंदोलन, त्याच्याविरोधात ओबीसींचा आंदोलन. या रूपामध्ये जातींची गणितं जुळवणं हे राजकीय पक्षांचं पहिलं ध्येय असल्याचं दिसतं.



लोकसभेतील दारूण पराभवानंतर भाजपप्रणीत महायुती कमबॅक करेल का?

लोकसभेच्या निवडणुकीनंतर महाविकास आघाडी प्रचंड पुढे होती. पण सध्या दोन्ही बाजू समसमान दिसत आहेत. गेल्या दोन महिन्यामध्ये वेगवेगळ्या घोषणा करून महायुतीने एक दीड टक्क्यांचा फरक भरून काढलेला आहे. आजच्या घडीला कुठलीच आघाडी विजयाचा दावा करू शकणार नाही. महाराष्ट्राची निवडणूक ही हरियाणाच्या धर्तीची नाही तर महाराष्ट्रालाच स्वतःचा आकार देणारी निवडणूक आहे. यामध्ये भाजपचा विजय झाला तर भाजपने राजकारणाची संपूर्ण कुस बदलून टाकली असं म्हणता येईल.



लाडकी बहिण कितपत यशस्वी?

महाराष्ट्रात आणि देशातल्या पुरुषसत्ताक राजकीय व्यवस्थेमध्ये महिलांच्या राजकीय मतांना फारसं महत्त्व मिळत नाही. त्यामुळे लाडकी बहीण योजनेचा एवढा मोठा परिणाम होईल असं सध्यातरी दिसत नाही. यामुळे या १५०० रुपयांमुळे महिला त्यांचं राजकीय मत बनवू शकतील आणि ते निर्णायक ठरेल असं चित्र सध्यातरी दिसत नाही. मात्र जिथे तिरंगी, चौरंगी, पंचरंगी आणि काही ठिकाणी सप्तरंगी सुद्धा आहे त्याठिकाणी किमान २० ते २५ हजार मतांची मदत ही महायुतीच्या उमेदवाराला मिळू शकतो.

बेरोजगारी, महागाई आणि उद्योग-धंदे गुजरात पळवणे हे मुद्दे कितपत यशस्वी ठरतील?

वेदान्ता फॉक्सकॉन, मेडिकल डिव्हाइस पार्क, बल्ग ड्रगपार्क, टाटा एअरबस, मदर डेअरी, सेमीकंडक्टर डिव्हाइस कंपनी, आर्थिक केंद्र गुजरातला नेणे, पालघर येथील पोलीस प्रशिक्षण केंद्र गुजरातला हलवणे, हिरे व्यापार सुरतला नेणे यांसारख्या मुद्यांची निवडणुकीत चर्चा होती. आणखी एक महत्त्वाच्या मुद्दा म्हणजे वाढत्या शहरीकरणामध्ये निर्माण होणाऱ्या सन्मानजनक रोजगाराच्या अपुऱ्या संधींचा. मुंबई, नवी मुंबई, ठाणे ,कल्याण- डोंबिवली, भिवंडी, पुणे, नाशिक, छ. संभाजीनगर आणि नागपूर ही काही मोजकी शहरे सोडली तर उर्वरित महाराष्ट्रात मागच्या काही दशकांमध्ये वस्तूंची निर्मिती करणारे नवीन कारखाने सुरू झालेले नाहीत. महाराष्ट्राचा भर या सेवाक्षेत्रावर राहिलेला आहे आणि यामध्ये गुंतलेल्या व्यक्तींचा रोजगार हा कायमस्वरूपी नाही आणि याला सन्मानजनक स्थान देखील नाही. यामुळे यंदाच्या निवडणुकीत असा रोजगार न मिळालेला मतदार काय करणार? यावरही बरच काही अवलंबून असणार आहे.



काँग्रेसची दुसरी फळी किती मजबूत किती कमकुवत? 

लोकसभेप्रमाणे विधानसभा निवडणुकीतही काँग्रेस हायकमांडने महाराष्ट्रातील विभागनिहाय स्थानिक नेतृत्वाला अधिकार देत त्यांचे हात बळकट केले आहे. पश्चिम महाराष्ट्रात कोल्हापूरची जबाबदारी ही सतेज पाटील या तगड्या नेत्याकडे दिली. त्यांनी सर्वाना जुळवून घेण्याचा प्रयत्न करत बंडखोरी शमवण्याचा प्रयत्न केला. सांगलीत विश्वजीत कदम, सोलापुरात प्रणिती शिंदे तसेच साताऱ्यात देखील त्यांनी पृथ्वीराज चव्हाण यांना बळ देणारे तरुण कार्यकर्ते गोळा केले आहेत. मुंबईत वर्षा गायकवाड, अस्लम शेख, अमीन पटेल, सचिन सावंत, नसीम खान यांच्यावर जबाबदारी टाकली. विदर्भात कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले असून त्यांनी भंडारा- गोंदियाची जबाबदारी स्विकारली आहे. गडचिरोलीमध्ये डॉ. नामदेव किरसान आणि विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्यावर सोपवली आहे. रामटेकची जबाबदारी ही सुनील केदार यांच्यावर असून नागपूरची विकास ठाकरे, नितीन राऊत यांच्याकडे देण्यात आली. अमरावतीत यशोमती ठाकूर असून वर्धा, यवतमाळ आणि वाशिमची जबाबदारी ही माणिकराव ठाकरे यांच्याकडे देण्यात आली आहे. मराठवाड्यात लातूरमध्ये अमित देशमुख यांच्याकडे असून जालन्यात आणि नांदेडमध्ये अनुक्रमे कल्याण काळे, खतगावकरांच्या मुलीकडे देण्यात आली. खान्देशात नंदुरबारची गोवाल पाडवी, धुळ्यात कुणाल पाटील, नगरमध्ये सत्यजीत तांबे आणि बाळासाहेब थोरात यांच्याकडे मोठी जबाबदारी दिली आहे.

बंडोबा किती झाले थंडोबा?

यंदाची निवडणूक ही १९९५ची आठवण करून देणारी असेल असे काही राजकीय विश्लेषक सांगत आहेत. १९९५ला सर्वाधिक ४५ अपक्ष आमदार निवडून आले होते आणि इतर छोटे मोठे पक्ष यांची संख्या २५ होती. त्यामुळे तशीच परिस्थिती आत्ताही होऊ शकते असे काही विश्लेषक म्हणत आहेत. यावेळी मायावतींचा बहुजन समाज पक्ष यांनी सर्वाधिक २३७ उमेदवार उभे असून त्याखालोखाल २०० उमेदवार हे प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीने उभे केले आहेत. जवळपास १५८ उमेदवार हे राज ठाकरेंच्या मनसेचे असून त्यांचा प्रभाव हा मुंबई, कल्याण, ठाणे, नाशिक आणि पुण्यातील काही भागात आहे. त्यात बच्चू कडू, राजू शेट्टी आणि संभाजीराजे भोसले यांची तिसरी आघाडी देखील आपले भविष्य आजमावत आहे. काही छोटे पक्ष आणि मविआ, महायुतीचे मिळून १३२ उमेदवार रिंगणात आहेत. त्यात महायुतीचे ६७ तर महाविकास आघाडीचे ६५ उमेदवार कोणाची मते खाणार आणि त्याचा कोणाला फटका बसणार हे देखील तितकेच महत्वाचे आहे.



यावेळेला होणाऱ्या महाराष्ट्राच्या निवडणुकीबाबत दोन शब्द वापरायचे झाले तर ते म्हणजे 'अभूतपूर्व रणधुमाळी.' महाराष्ट्राच्या राजकारणाचं जे काही अधःपतन झालेलं आहे त्याचं प्रतिबिंब आपल्याला या निवडणुकीत दिसतंय. निवडणुकीतील उमेदवारांच्या याद्या बघितल्या तर हे लक्षात येईल. बंडखोरी ही गोष्ट महाराष्ट्राला नवीन नाही. यंदाची निवडणूक आठवड्याच्या मधल्याच दिवशी ठेवल्याने मतदानाचा टक्का वाढण्याची अपेक्षा निवडणूक आयोगासह विविध पक्षांनी ठेवली आहे. प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी किती मतदारांना घराबाहेर काढण्यात यश मिळते यावर सारे गणित अवलंबून असणार आहे.

Wednesday, 6 November 2024

जगदीश मुळीकांच्या माघारीने सुनील टिंगरेंचा अडसर दूर, वडगाव शेरीत तुतारीचा सूर की घड्याळाची टीकटीक?



पुण्यात भाजपला ज्याची भीती होती तेच घडलं आहे. निवडणुकीच्या तोंडावर अजित पवारांनी सुनील टिंगरेंच नाव घोषित केल्याने जगदीश मुळीक यांनी माघार घेतली. फडणवीसांच्या सांगण्यावरून हा मोठा निर्णय घेतला असे मानले जात आहे.

पुण्यात भाजपला ज्याची भीती होती तेच घडलं. निवडणुकीच्या तोंडावर भाजपचे माजी आमदार जगदीश मुळीक यांनी मोठा निर्णय घेतला आहे. त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सांगण्यावरून शेवटच्या काही मिनिटांत हा निर्णय घेतला, त्यामुळे शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेससाठी खूप मोठा धक्का मानला जात आहे. दुसरीकडे, मुळीक खरच किती सुनील टिंगरेंना साथ देतील हे पाहणे देखील औत्सुकतेचे ठरणार आहे.


वडगाव शेरी मतदार संघावर भाजपचा दावा होता

ज्या ठिकाणी ज्या पक्षाचा आमदार ती जागा त्या पक्षाला मिळेल असे सर्वसाधारण सूत्र महायुतीमध्ये आहे. वडगाव शेरीमध्ये अजितदादांच्या राष्ट्रवादीचे आमदार असल्याने या जागेवर त्यांनी दावा केला आहे. त्यातच भाजपनेही या जागेवर दावा केला होता. भाजपचे जगदीश मुळीक यांनी वडगाव शेरीमधून निवडणूक लढवण्याची इच्छा या आधीच व्यक्त केली होती. त्यामुळे यावरून महायुतीत वाद होण्याची शक्यता निर्माण झाली होती. मात्र फडणवीस यांच्या मनधरणीनंतर जगदीश मुळीक यांनी अर्ज भरण्यासाठी शेवटचे काही मिनिट बाकी असताना निवडणुकीला उभे राहणार नाही असा निर्णय घेतला. 

अजित पवारांच्या पक्षाचे विद्यमान आमदार सुनील टिंगरे यांना वगळून आपल्याला उमेदवारी मिळेल, भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी आपल्याला तसे आश्वासन दिल्याचा दावा भाजपचे माजी आमदार जगदिश मुळीक यांच्याकडून करण्यात आला होता. मात्र, पुन्हा सुनिल टिंगरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे या मतदारसंघात बापू पठारे विरुद्ध सुनिल टिंगरे असा सामना होणार आहे.



पोर्शे प्रकरणात सुनील टिंगरे चर्चेत

वडगाव शेरीचे विद्यमान आमदार सुनील टिंगरे हे राष्ट्रवादीतील फुटीनंतर अजितदादांसोबत गेले. पुण्यातील पोर्शे प्रकरणानंतर सुनील टिंगरे हे चांगलेच चर्चेत आले होते. पोर्शे  प्रकरणात आमदार सुनील टिंगरे यांनी उद्योगपतीच्या मुलाला वाचवण्यासाठी पोलिसांवर दबाव आणला अशी चर्चा होती. परंतु आपण फक्त या प्रकरणाची माहिती घेण्यासाठी पोलिस स्टेशनमध्ये गेलो होतो असं स्वतः सुनील टिंगरे यांनी माध्यमापुढे येऊन सांगितलं होतं.

४ नोव्हेंबरला उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता. त्यानंतर अनेक उमेदवारांनी अर्ज मागे घेतले असले तरी, अनेक ठिकाणी अजूनही बंडखोर आपल्या भूमिकांवर ठाम आहेत. त्यामुळे आता राजकीय पक्षाचे उमेदवार निश्चित झाले आहेत. सर्वच राजकीय पक्षाच्या उमेदवारांनी प्रचाराला दणक्यात सुरुवात केली आहे. वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उभे असणारे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवार बापूसाहेब पठारे यांनी देखील उमेदवारी जाहीर होण्याच्या आधीपासूनच प्रचाराला सुरुवात केली होती. 



दिवाळीमुळे मंदावलेला प्रचाराने आता पुन्हा एकदा वेग घेतला आहे. "ताई आहे का घरातं, तुतारी आलीया दारातं," अशा प्रकारची गाणी गात घरोघरी पठारेंचा प्रचाराला सुरुवात केली आहे. त्यामुळे वडगाव शेरीत या दोन्ही उमेदवारांच्या रूपाने काँटे की टक्कर पाहायला मिळेल अशी शक्यता आहे.

राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार बापू पठारे मालमत्ता विवरण

जंगम मालमत्ता विवरण

१) बापूसाहेब तुकाराम पठारे - २,२९,२०,३६७/-

२) संजिला बापूसाहेब पठारे (पत्नी) - १,१६,८८,६२१/-

३) अविभक्त कुटुंब - ११२,७२,२९,७६६/-

४) सुरेंद्र बापूसाहेब पठारे (मुलगा) - २५,२२,५९,२०६/-

एकूण मूल्य - १४१,४०,९७,९६०/- 

 स्थावर मालमत्ता

१) बापूसाहेब तुकाराम पठारे - २८,४४,७९,२७८/-

२) संजिला बापूसाहेब पठारे (पत्नी) - ११,७४,७६,५२१/-

३) अविभक्त कुटुंब - १४,३८,६७,०१८/-

४) सुरेंद्र बापूसाहेब पठारे (मुलगा) - १११,९६,७५,१२८/-

एकूण मूल्य - १६६,५४,९७,९४५/

स्थावर व जंगम मालमत्तेची एकूण रक्कम - ३०७,९५,९५,९०५/- बँक कर्ज - बापूसाहेब पठारे यांच्या नावे ९५,२६,८३९ रुपये, संजिला पठारे यांच्या नावे ९,४३,२०८ रुपये; तर सुरेंद्र पठारे यांच्या नावे ४१,३७,६५,०२९ इतकी देणी आहे. कर्जस्वरूपात एकूण ४२,४२,३५,०७६ आहे.



राष्ट्रवादी अजित पवार गटाचे उमेदवार सुनील टिंगरे एकूण मालमत्ता

स्थावर व जंगम मालमत्तेची एकूण रक्कम ५३ कोटी ८१ लाख ४२ हजार ९७३ रुपये. (जंगम - स्वत:च्या नावे ५,४५,४४,३५९, तर पत्नी मनीषा टिंगरे यांच्या नावे १,६२,७९,२५३ रुपये. स्थावर - स्वत:च्या नावे २७,२७,५९,३५४ रुपये, तर पत्नीच्या नावे १९,२७,५९,७५४ रुपये.)